गुरुजी तू मला आवडला !
By माने युवराज
गुरुजी तू मला आवडला !हा गुरुजी मुलांना शिकवता-शिकवता खूप सारं काही शिकतो.आणि समृद्ध होत जातो. इतका समृद्ध होतो की मुलांकडून हरण्याची ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते.
Availability
available
Original Title
गुरुजी तू मला आवडला !
Subject & College
Publish Date
2020-01-01
Published Year
2020
Publisher, Place
Total Pages
182
ISBN 10
8194787467
ISBN 13
978-8194787464
Format
paper
Country
INDIA
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
गुरुजी,तू मला आवडला
पुस्तक परीक्षण :- कु.निकिता अरुण मेचकर तृतीय वर्ष कला राज्यशास्र विभाग , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर ‘गुरुजी,तू मला आवडला’ पुस्तकाच्या या नावातच हे पुस्तक म्हणजे...Read More
करडे मिहीर यशवंत , सरस्वती मंदिर नाइट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, पुणे.
गुरुजी,तू मला आवडला
पुस्तक परीक्षण :- कु.निकिता अरुण मेचकर तृतीय वर्ष कला राज्यशास्र विभाग , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर
‘गुरुजी,तू मला आवडला’ पुस्तकाच्या या नावातच हे पुस्तक म्हणजे लाडक्या गुरुजींच्यासोबत शिक्षण प्रवास आरंभलेल्या लेकरांच्या आनंददायी शिक्षणाचा सोहळाच असावा असं वाटलं. लेकरांकडूनच गुरुजींना तू मला आवडला अशी मायेची पोचपावती मिळणं म्हणजे खरंच एक शिक्षक म्हणून लेखक युवराज माने यांचा हा मोठा सन्मानच आहे.एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसोबत अनुभवलेला प्राथमिक शिक्षणाचा आनंदमेळा ,एक लेखक म्हणून मनात टिपून ठेवला आणि त्याच शिक्षणाचा सोहळा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर शब्दांत मांडला आहे.
मुलांच्या भावना,अपेक्षा ,इच्छा ,हट्ट या साऱ्यांचा आदर करत एक शिक्षक मुलांशी कसं अतूट प्रेमाचं नातं जोडू शकतो,याचे अनेक दाखले पुस्तकातील अनेक प्रसंगातून डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. पुस्तकातून आपल्यालाही अनेक व्यक्तिरेखा,अनेक झाडे-वेली,पशु-पक्षी,कीटक,विविध प्रकारचे ममनोरंजक खेळ,खेळाची मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली साधने यांची ओळख तर होतेच शिवाय आपण या मुलांच्या विश्वात असे काही रममाण होऊन आपल्याच बालपणात हरवून जातो की पुस्तक खाली ठेवायची इच्छाच होतं नाही.पाठय पुस्तकातील अध्यापनासोबतच व्यावहारिक ज्ञानाचे,भावनिक व काल्पनिक विश्वाचे भांडार मुलांसाठी खुले करताना सरांनी केलेल्या अनेक प्रयोगांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.निसर्गाच्या सानिध्यात मुलांचे कुतूहल जागृत करत आणि तितक्याच सक्षमतेने त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी माने सरांनी केलेले प्रयोग आणि मुलांना शिक्षण प्रवासात टिकून राहण्यासाठी वारंवार दिलेले प्रोत्साहन यातून संकलित झालेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे ‘गुरुजी,तू मला आवडला’ हे पुस्तक…
गुरुजी तू मला आवडला !
डॉ.हनुमंत भवारी,सहयोगी प्राध्यापक, श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ. विद्यार्थ्याला देशाचा सक्षम नागरिक किंवा मुळातच माणूस बनवायचं जर असेल तर त्याचा प्राथमिक शिक्षणाचा पाया अत्यंत महत्त्वाचा...Read More
Bhawari Hanumant L.
गुरुजी तू मला आवडला !
डॉ.हनुमंत भवारी,सहयोगी प्राध्यापक, श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ.
विद्यार्थ्याला देशाचा सक्षम नागरिक किंवा मुळातच माणूस बनवायचं जर असेल तर त्याचा प्राथमिक शिक्षणाचा पाया अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात प्राथमिक शिक्षणासंदर्भात बदललेली शासनाची धोरणं आणि एकूणच शिक्षणाकडे बघण्याची शासनकर्त्यांची भूमिका हे सारंच काही आव्हानात्मक आहे. जपानमध्ये शिक्षणाचा उद्देश व्यक्तीला माणूस घडविण्याचा आहे. तो विद्वान कदाचित नंतर बनेलही. परंतु आपण विद्वान घडविण्याच्या नादात माणूस घडविणेच विसरतोय की काय? असा प्रश्न पडायला लागलाय. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना पहिल्या तर याची प्रचिती येते.
युवराज माने यांचं दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं ‘गुरुजी तू मला आवडला’ हे पुस्तक नुकतंच वाचून संपवलं. ‘गुरुजी तू मला आवडला’ या पुस्तकाच्या शीर्षकातच मला वाटतं, या पुस्तकाचं सारं गुपित दडलेलं आहे. एखादा व्यक्ती ‘माणूस’ म्हणून आवडला तरच आपण त्याच्या अंतरंगात शिरायचा प्रयत्न करतो. एखादा शिक्षक आवडला तर त्याचा विषय आवडायला लागतो. आता हे आवडणं मी बाह्यपातळीवरती म्हणत नाही. ज्ञानाच्या, सर्जनशीलतेच्या, अभिव्यक्तीच्या, कृतीशीलतेच्या अगदी नैतिकतेच्या या अनुषंगाने आवडणं हे मला अभिप्रेत आहे.
आज आपल्या व्यवस्थेने अनेक मुलांच्या शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतला आहे. ऊसतोड कामगार, मेंढ्या चारणारे मेंढपाळ, अशाप्रकारे वर्षातील बाराही महिने पोटापाण्यासाठी भटकंती करणारी माणसं, यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहतो. बरं, या मुलांना शिकविण्यासाठी आपल्याकडे तशी काही योजनाही नाही. आणि कोणतीच यंत्रणा आपण त्यासाठी उभीही केलेली नाही. त्यामुळे या मुलांना इच्छा असूनही शिक्षणापासून दूरच राहावं लागतं. अशीच एक ऊसतोड कामगाराची ‘ममता’ नावाची मुलगी. काही दिवस शाळेत येते. रमते, शिक्षणाच्या आनंदात नाहून जाते, शाळेतील वातावरण तेथील शिक्षक, तिला मनापासून आवडू लागतात. ‘गुरुजी तू मला आवडला’ असं व्यक्त होण्याचं धाडसही तिच्यात निर्माण होते. मला वाटतं ‘गुरुजी तू मला आवडला’ हे ममताचे उद्गार लेखक युवराज माने यांच्या कार्याची पोहचपावतीच आहे. ती कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही.
लेखकाने सांगितलेली आनंदाची डहाळी ही संकल्पना मला भन्नाट वाटते. डहाळी म्हणजे मोठी फांदी नाही तर त्या फांदीचा एक छोटासा भाग. त्या डहाळीवर पक्षी आनंदाने बसू शकतो. झोके घेऊ शकतो. गाणं गाऊ शकतो आणि मनातलं गुपितही सांगू शकतो. अशी डहाळी शिक्षकाला होता येणे हेच शिक्षक असण्याचं मुख्य लक्षण असायला हवं. शिक्षकाबरोबरच शाळा हे ठिकाणही मुलांना आवडलं पाहिजे. मुलं त्या ठिकाणी रमली पाहिजेत. “अरे, इथे मजा आहे की” असे मुलांना वाटले पाहिजे आणि हाच मुख्य धागा युवराज माने यांनी अचूकपणे पकडलेला दिसतो. लेखनाची खरडपट्टी आणि पाठांतराची घोकमपट्टी याच्या दावणीला शिक्षण न बांधता, त्याला नवीन अनुभव घेण्यासाठी वातावरण निर्माण करून देणे. एखादी ‘बी’ कशी रुजते आणि झाड कसं उगवतं हे वर्गात चार भिंतीच्या आत न सांगता प्रत्यक्ष ‘बी’ लावून निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करून देणे, सहल गाडीच्या माध्यमातून सभोवतालचे भवताल न्याहाळणे, नवे नवे मित्र जोडणे, शाळेच्या स्वयंपाक घरात रमणे, आजी-आजोबांना शाळेत बोलावणे, वाचनाला त्रासदायक न बनवता वाचनाचा आनंदसोहळा करणे, गोष्टी फक्त ऐकण्यापेक्षा गोष्टी निर्माण करण्याची सर्जनशीलता वाढीस लावणे, चिमणीच्या घरट्यातून प्राण्या-पक्षांबद्दलची संवेदनशीलता रुजवणे, कल्पनाशक्तीच्या विकासासाठी आभाळ मोकळं करून देणे, वर्ग सभा घेऊन नेतृत्वाची, वक्तृत्वाची उर्मी निर्माण करणे, अशा प्रकारचे विविध अनुभव देणारा हा गुरुजी मुलांना शिकवता-शिकवता खूप सारं काही शिकतो. आणि समृद्ध होत जातो. इतका समृद्ध होतो की मुलांकडून हरण्याची ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते.
भुरा या पुस्तकात डॉ. शरद बाविस्कर म्हणतात की, शिक्षण म्हणजे मुलांच्या हातात रेडिमेड पेंटिंग देणे नव्हे तर त्यांना भरपूर रंग देणे आणि कॅनव्हासचा आकार वाढवत नेणे. हा कॅनव्हासचा आकार वाढवण्याचे काम लेखक युवराज माने हे अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. असे मला वाटते. हे पुस्तक प्रत्येक शिक्षकांनी तर वाचलेच पाहिजे परंतु सर्व पालकांनीही वाचायला हवे.
