Review By Prof. Vijay Shivaji Ghare, Baburaoji Gholap College, Pune पुस्तकाचे शीर्षक: “ब्युटी ऑफ लाईफ: डायरी ऑफ द डायरी ऑफ कॅन्सर
Read More
Review By Prof. Vijay Shivaji Ghare, Baburaoji Gholap College, Pune
पुस्तकाचे शीर्षक: “ब्युटी ऑफ लाईफ: डायरी ऑफ द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर”
आजारपण माणसाची कसोटी पाहत असते. डॉक्टर औषधपाणी करत असतात पण मानसिकदृष्ट्या रुग्ण खंबीर असेल तर आजारपणातून लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. आशा नेगी यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारपणात आपण कशा खंबीर राहिलो,माणूस म्हणून जरी आपल्यात काही नकारात्मक विचार आले तरी आपण सकारात्मकतेकडे कशी सुरुवात केली याचा उहापोह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. तसेच या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्याचा कसा उपयोग झाला यांचे त्यांनी केलेले दैनंदिनी स्वरूपातील लेखन म्हणजे हे पुस्तक ‘ब्युटी ऑफ लाईफ: द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर.’ सदर दैनंदिनी स्वरूपात लिहिलेल्या या पुस्तकात आपल्यामुळे आपल्या हितचिंतकांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आजार लपवणे असो किंवा पाठपुराव्यासाठी झालेली मनाची चलबिचल असो लेखिकेची खंबीर पणाची साक्ष देऊन जाते. आपल्या दोन छोट्या मुलींसाठी होणारी तगमग त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. याचे शब्दांकन संजना मगर यांनी योग्य प्रकारे केले आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून सकारात्मक विचार येथे माडले आहेत. एका सुखवस्तु महिलेची या गंभीर आजारामध्ये झालेली तगमग, कुटुंबवत्सलता, मैत्रीची गरज, फायदा हे सर्व समर्थपणे त्यांनी येथे प्रकर्षाने मांडले आहे. तसेच ‘आनंदी जगा, हसत जगा’ हा संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात जीवन अनिश्चित आहे. आशा-निराशेने भरलेले आहे म्हणूनच आयुष्य सुंदर आहे. आपल्यासारखी साधी माणसं पण कशाप्रकारे एवढ्या गंभीर प्रसंगातून सहजपणे सकारात्मक विचारसरणी ठेवून निभावून जातात हे निदर्शनास आले. हे पुस्तक अशा प्रसंगातून जाणाऱ्या सर्वांना प्रेरित करू शकते. जीवनात शिकलेल्या गोष्टींचा त्यांना बऱ्याच ठिकाणी फायदा झाला. आयुष्यात आर्थिक प्लॅनिंग फार गरजेचे आहे. मित्रमंडळी, सगेसोयरे,नातेवाईक, आप्तेष्ट अशा कोणाचीच सहानुभूती घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.प्रा डॉ वैभव ढमाळ पुणे, प्रस्तावना देवा झिंजाड यांचे त्या विशेष आभार मानतात. एका क्षणी लेखिका हार मानण्याच्या मन:स्थितीत जाते पण पुन्हा मनाचा निग्रह करून आता लढायचे, रडायचे नाही असे ठामपणे मनावर बिंबवून मार्गक्रमण करत राहते. सर्वसामान्य माणसाच्या मनात येणारे विचार लेखिकेच्या मनातही प्रत्येक वळणावर येतात पण त्यात ती धीरोदत्तपणे त्यांना सामोरे जाते. आयुष्य खूप सुंदर आहे. नकळतपणे आपण आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व चढ-उतारांचा आलेल्या,बऱ्या-वाईट प्रसंगाचा त्या-त्या वेळेस कसा विचार केला, कसा विचार करायला हवा होता याची तुलना (comparison) आपण करू लागतो. त्यांनी काही गोष्टी धीटपणे मांडलेल्या आहेत. आयुष्यात जे होतं ते चांगल्यासाठीच कॅन्सर फक्त शरीरावर होतो. तो तुमच्या मनाला कधीच होऊ शकत नाही.पुस्तकाची अंतर्गत मांडणी रत्नेश चोरगे यांनी केलेली आहे. कोणत्याही आजाराने नाउमेद झालेल्या माणसाला एक सकारात्मक दिशा देणारे हे पुस्तक आहे. या दृष्टीने आजच्या काळात या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे मला वाटते.
Show Less