
महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे साहित्य समग्र मानवतेचा पाया रचते, मानवी मूल्यांचे वर्धन करते. त्यांनी मानवाच्या भटकंतीची शास्त्रीय मांडणी ‘घुमक्कडशास्त्र’ (हिंदी आवृत्ती) या पुस्तकात १९४९ साली सर्वप्रथम केली. मानवी मनातील भटकंतीबद्दलचे कुतूहल आणि भटकंतीची संकल्पना स्पष्ट करतानाच त्यांनी मानवतेच्या तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे. भटक्याने दुर्बल आणि याचक बनून भिकारी जीवन जगायचे नसते तर भटकंती योग्य वयापर्यंत शिक्षण घेऊन शारीरिक आणि बौद्धिक कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी बनायचे असते असे त्यांना वाटते.
कला आणि कौशल्ये भटक्यासाठी महत्तम आहेत. राहुल सांकृत्यायन यांनी प्रेम, धर्म आणि देश यांच्या संबंधाने भटकंतीची केलेली ही मांडणी वाचकाला त्याचा भटकंतीबद्दलचा प्रचलित दृष्टीकोन बदलून मानवतेच्या पायावर उभे करते. स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडे भटकंतीसाठी राहुल सांकृत्यायन समान दृष्टीकोनातून पाहतात. या शास्त्राच्या मांडणीतून राहुलजी वैयक्तिक आणि सामाजिक समतेबरोबरच मानवाच्या नैसर्गिक स्वातंत्र्याची मांडणी करतात. मानवी मूल्यांच्या आड येणारी अनाठायी बंधने झुगारून देण्याचा संदेश राहुल सांकृत्यायन देतात. साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार आणि विचारवंत यांना भटकंती प्रगल्भ करते. लेखणी, ब्रश आणि छन्नी यांच्याबरोबर भटक्याचे नाते असते. राहुल सांकृत्यायन हे नाते शास्त्रीय पद्धतीने विशद करतात. भटकंतीचे शास्त्र मांडताना त्यांनी हजारो वर्षांचा आढावा घेणारी जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली अनेक उदाहरणे दिलेली आहेत. असे असले तरी, बुद्ध, हिमालय आणि तिबेट हे या शास्त्राच्या हृदयस्थानी आहेत.
– डॉ.विजय भगत
भटकंतीच्या प्रकाशवाटेने अज्ञानाचा भूप्रदेश उजळून टाकणारे पुस्तक म्हणजे ‘भटकंतीशास्त्र’ झापडबंददृष्टी आणि कूपमंडूकवृत्ती यांना नाकारत प्रबुद्ध होण्यासाठी देशाटन केले पाहिजे असा संदेश पुस्तकाच्या पानापानावर आहे. भटकणे हा पुस्तकाचा मुख्य विषय असला तरी सदरील पुस्तक हे प्रवासवर्णनाचे पुस्तक नाही. पुस्तकात सगळीकडे भटकंतीच्या तत्वज्ञानाची चर्चा आहे. भटकंती ही माणसाला ज्ञानी, डोळस आणि व्यापक बनविते. अनेक गोष्टी शिकविते तसेच, मोहपाशाची बंधने तोडायला आणि देशी-विदेशी प्रेमैत्र जोडायलाही शिकविते. तारुण्यात सगळ्यांनी भटकंती करायला हवी कारण त्यामुळे माणसाच्या आयुष्याला दिशा आणि मार्ग सापडतात. त्याअर्थाने, ‘भटकंतीशास्त्र’ हे माणसाला काहीसे बिघडविणारे आणि बरेचसे घडविणारे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे.
– डॉ. देवकुमार अहिरे