Dhanwate Rahul Suresh,Assistant Librarian,(rahul.dhanwate@mmcc.edu.in) Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune शीर्षक - वपुर्झा लेखक- व.पु.काळे प्रकाशक - मेहता
Read More
Dhanwate Rahul Suresh,Assistant Librarian,(rahul.dhanwate@mmcc.edu.in)
Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune
शीर्षक – वपुर्झा
लेखक- व.पु.काळे
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत -250
व.पु.काळे लिखित वपुर्झा ही कादंबरी अतिशय उत्कृष्ट आणि अव्वल दर्जाचे लिखित पुस्तक आहे. लाखो वाचकांच्या मनात या कादंबरीने घर करून ठेवले आहे. जसं की लेखक व.पु.काळे म्हणतात की “कोणतंही पान उघडा आणि वाचा” याच उक्ती प्रमाणे या पुस्तकात आपल्याला लेखन पाहायला मिळते कारण जेव्हा जेव्हा हे पुस्तक मी वाचनासाठी घेतले तेव्हा कधीही कंटाळवाणे मला वाटले नाही कारण प्रत्येक पान हे वेगवेगळे अनुभव देत गेले. प्रत्येक पानात वेगवेगळ्या छटा रंगवलेल्या आहेत. या पुस्तकाची भाषा देखील अतिशय सोपी आणि सहज आहे ज्यात वेगवेगळे प्रसंग हे अगदी विनोदी रीत्या दर्शविण्यात आले आहेत तर काही प्रसंग मर्मभेदी आहेत तर काही विवेचनात्मक आहे.
या पुस्तकाच्या पृष्ठभागावरती एक पेला म्हणजेच ग्लास हा रिकामा दाखवला आहे ज्याचा अर्थ व.पु.काळे यांनी असा लावला आहे की हा प्याला म्हणजे आपलं मन आकाशाचा शब्द झेलण्यासाठी हा कायम रीताच असावा. मनातली साठलेली मळमळ, जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या, म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो.
या पुस्तकाच्या मागील पृष्ठभागावर पुस्तक कसे आहे तसेच हे पुस्तक कुणासाठी आहे तसेच हे पुस्तक कसे वाचावे याबाबतीत लेखक व.पु.काळे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
तसे पाहिले गेले तर हे पुस्तक 258 पानांचे आहे परंतु; जेव्हा वाचक वाचन करण्यास सुरुवात करतो तेव्हा तो अगदी हरवून जातो त्याला आपण किती पाने वाचलीत याचे भान राहत नाही आणि आणखी जरा वाचायला हवं अशी मनात हुरहूर लागते.
माझ्या मते, व.पुं.च्या लेखनाची खासियत म्हणजे वाचकाला क्षणभर थबकावून विचार करण्यास भाग पडणे, गोष्टी इतक्या सध्या अन सोप्या शब्दात मांडणे की, वाचतांना असं वाटल्यावाचून राहणार नाही की, “माझ्यासोबातही हेच घडलं होतं अथवा घडत आहे. ही त्यांची कलाच म्हणावी की ते वाचकाला एखाद्या गोष्टीकडे, परिस्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघण्यास प्रवृत्त करतात.त्यांच्या मार्मिक लिखाणातून व.पुं. चं व्यक्तिमत्व किती विस्तृत आणि सकारात्मक होतं हे ध्यानास येतं…
“व्यक्ती तितक्या प्रवृत्ती” ह्या विधानाला दुजोरा देत त्यांनी त्या प्रत्येक “प्रवृत्ती” बद्दलचे बारकावे, त्यातली गुंतागुंत अत्यंत डोळस पद्धतीने मंडली आहे.
पुस्तकातील काही उतारे अत्यंत मानवी स्वभावास एकदम साजेसे आहेत
“आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका.”
या उताऱ्यात व.पु.फक्त उपदेशच देत नसून त्यावर विश्वास कसा ठेवायचा हे देखील दाखवून देतात.
शेवटी जाता जाता व. पु.वपुर्झा मध्ये काही ओळी सांगून जातात
“नुसत्या विचाराने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरत चिरंजीव होतं. करमणूक करून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही. साहित्य हे निव्वळ चून्यासारखा असत. त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही.”
Show Less