Suyash Jadhav Department of Bioinformatics Savitribai Phule Pune University मागील काही काळात मी तीन-चार पुस्तके वाचायला घेतली होती, पण ती
Read More
Suyash Jadhav
Department of Bioinformatics
Savitribai Phule Pune University
मागील काही काळात मी तीन-चार पुस्तके वाचायला घेतली होती, पण ती अर्धवट सोडून दिली. त्यातून मला समाधान मिळाले नाही आणि वाचनाची भूक असूनही काही वाचले जात नव्हते. तेव्हा मी माझ्या कपाटाकडे पाहिले आणि माझी नजर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर स्थिरावली. काही वर्षांपूर्वी नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी घेतलेले हे पुस्तक वाचायचे ठरवले,आणि मी त्यात पूर्णपणे हरवून गेलो.
‘श्यामची आई’ हि प्रसिद्ध लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थातच साने गुरुजी यांची १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीतील सहभागावरून शिक्षा भोगत असताना अवघ्या पाच दिवसांत लिहलेली, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अद्वितीय ठेवा आहे. ही कथा आहे एका आईची, आपल्या मुलांवर अपार माया करणारी आईची, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी आईची; पण हे संस्कार उपदेशाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्या-छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना कठोर बनणारी ‘श्यामच्या आई’ची.
मुख्य पात्र श्याम हा एक निष्पाप, निरागस आणि कुतूहलाने भरलेला मुलगा आहे. गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाल. त्याचं बालपण साधेपणाने आणि आईच्या संस्कारांनी भरलेलं आहे. श्याम हा जिज्ञासू, समजूतदार आणि आपल्या आईवर अपार प्रेम करणारा आहे. आईच्या शिकवणीमुळे तो जीवनातील नैतिक मुल्ये शिकतो आणि आपल्या चुका सुधारण्याच्या प्रयत्न करतो. त्याच्या निरागसतेतून वाचकाला स्वत:चं बालपण आठवायला लागतं. जीवनात आलेल्या अडीअडचणीतून, परिस्थितीचा चटका सहन करत, माधुकरी मागत श्यामचा मोठा भाऊ शिक्षण घेत असतो आणि खडतर परिस्थितीत श्याम आईवडिलांजवळ राहून विद्यार्जन करीत असतो.
आई मैत्रीण बनून त्याला जीवनमूल्य शिकवत असते. प्रसंगी ती त्याच्यावर हातदेखील उगारते. परंतु तिच्या या दटावण्यातच तिचे प्रेम दडलेले असते. आपल्या मुलाला सर्व यावे, त्याने प्रत्येक गोष्ट शिकावी अशी तिची धडपड असायची. पुस्तकातील प्रत्येक प्रसंगातून श्यामच्या आईच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसून येते. ‘श्याम, मोह सोडणे म्हणजे धर्म!’ अशी ती धर्माची अतिशय सरळ, सुंदर व स्पष्ट व्याख्या श्यामला विश्लेषण करून सांगते.
काळ कठीण असला तरी आपले नैतिक मूल्य विसरायचे नाहीत, हा आईचा धडा पुढे श्यामच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून व्यक्त होतो. लोकांविषयी आदर, वृद्ध, दीनदुबळ्या लोकांविषयीचा कळवळा या पुस्तकातून साने गुरुजींनी फार सुंदर रीतीने लिहलेला आहे. दीनदुबळ्यांच्या मदतीला तत्पर राहणारा श्याम, जातीभेद न मानता ब्राह्मण असूनही दलित म्हातारीला मदत करताना दिसतो, तेव्हा वाचकाला आपल्याच वर्तनाचा विचार करायला लावतो.
आईच्या सहवासात श्यामचा कसा घडाव होत गेला, तसेच आईच्या कोणकोणत्या गुणांचा त्याला अनुभव आला आणि तिची थोरवी त्याला कशी उमगली, हे सांगतानाच लेखक श्यामच्या मर्यादा व कोतेपण हळूहळू सूचित करतो. रामरक्षा स्तोत्र लिहून घेण्याची गोष्ट असो, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग असो, वडिलांवर रुसण्याचा प्रसंग असो किंवा नोट चोरून घेण्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग लेखकाने आपल्या लेखनात टिपून ठेवले आहेत. श्यामला स्वतःच्या दोषांची जशी जाणीव होत जाते, तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक उजळत जाते आणि ते विकास पावते.
श्यामच्या या संपूर्ण प्रवासात त्याचे वडील, आई व बहिण महत्वपूर्ण भूमिका बजावतात. वडिलांचा स्वभाव कठोर, शिस्तप्रिय आणि आदर्शवादी असून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे कठोरपण पाहायला मिळते. पुढे श्यामच्या व्यक्तिमत्वावर वडिलांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा मोठा प्रभाव दिसून येतो. आईप्रमाणेच मृदू स्वभावाची, कुटुंबाची काळजी घेणारी आणि भावंडांबद्दल अतिशय प्रेम करणारी श्यामची बहिण त्याला समजून घेताना आणि आधार देताना दिसते.
‘श्यामची आई’ या कादंबरीत साने गुरुजींनी कोकणी मराठी भाषेचा सुंदर आणि नैसर्गिक वापर केला आहे. कोकणातील त्यांच्या पार्श्वभूमीमुळे ग्रामीण भाषेचे वळण आणि कोकणी बोलीतील शब्द कथेच्या संवादांमध्ये सहजपणे मिसळले आहेत. या शब्दांमुळे कादंबरीत गोडवा आणि स्थानिक रंग अधिक ठळक होतो. “आंबा,” “बाबल्याला,” “हळद-मिरसंग” यांसारखे शब्द कोकणी मराठी भाषेची झलक देतात. संवादातील या शब्दांच्या वापरामुळे पात्रे जिवंत वाटतात, तसेच वाचकांच्या जीवनाशी अधिक जवळची वाटते. निसर्गाचे वर्णन, भावनिक प्रसंग, आणि पात्रांमधील संवादांमध्ये कोकणी बोलीची ओघवती गोडी जाणवते. सुट्टीत नदीवर पोहायला जाणे, मैदानी खेळ, मस्ती, भांडण या मानवी पैलूंना साने गुरुजींनी इतके छान रंगविले आहे की प्रत्येक व्यक्तीला ती कथा स्वतः चीच असल्याचा भास होतो. या भाषाशैलीने कादंबरीला ग्रामीण आणि भावनिक सौंदर्य दिले आहे, ज्यामुळे ती वाचकांच्या हृदयावर अमिट छाप सोडते.
श्यामला आईविषयी वाटणारे प्रेमापेक्षा तिने त्याला दिलेले संस्कार जास्त लक्षात राहतात. श्यामची व्यक्तिरेखा ही साने गुरुजींनी अत्यंत आदर्शवादी पद्धतीने उभी केली आहे. त्याच्या भावनिक आणि नैतिक विकासाचा प्रवास वाचकाला प्रेरणा देतो, परंतु कधी-कधी ती व्यक्तिमत्व अतिरेकी परिपक्व वाटते. तरीही श्याम, हा त्याग, संस्कार, आणि प्रेमाचे प्रतिक बनून कादंबरीच्या हृदयाला धरून ठेवतो आणि त्याच्या विकासातून साने गुरुजींचा सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचतो.
‘श्यामची आई’ हि कादंबरी आजच्या काळातील तुटलेली नाती, नैतिकतेचा अभाव, आणि व्यक्तिस्वार्थी जीवनशैलीच्या समस्यांवर प्रकाश टाकते. ही कादंबरी कालातीत आहे आणि प्रत्येक पिढीला त्याग, ममता आणि संस्कारांचे महत्व अधोरेखित करत शिकवते की नात्यांचा खरा गाभा प्रेम आणि आदरात आहे. आधुनिक काळातील सामाजिक विघटनाला उत्तर देण्यासाठी साने गुरुजींचे हे विचार आजही तेवढेच मौल्यवान आहेत. ही कादंबरी केवळ शब्दसंग्रह नसून, एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दिलेली भावनिक भेट आहे. संस्कारक्षम साहित्य वाचण्याची आवड असलेल्या सर्वांनी ही कादंबरी जरूर वाचावी; कारण मातृत्वाच्या प्रेमाचे प्रतीक ही कालजयी कादंबरी, अखेरपर्यंत वाचकाच्या मनात गुणगुणत राहते एका आईचे शाश्वत प्रेमाचे आर्त सूर…
Show Less