
SHYAMCHI AAI
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली...
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरूजीं लिखित ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतध्नता व्यक्त करणारा एक ग्रन्थ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरी रक्षण करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहूना येणा-या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते.
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे.
आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे कोतेपण, क्षुदत्व सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.
साने गुरुजींचे ‘श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस ‘प्रस्तावना’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर ‘रात्र पहिली’पासून ‘रात्र बेचाळिसावी’पर्यंत ४२ प्रकरणे आहेत