Review By Dr. Bharat Rathod, Associate Professor, Baburaoji Gholap College, Pune
विचारधारा या ग्रंथातून विविध राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज सुधारकांची माहिती दिलेली आहे. प्रामुख्याने विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, सदानंद मोरे, रावसाहेब कसबे यांचा राजकीय दृष्टिकोन विस्तृत स्वरूपात विशद केला आहे. राजकीय जीवनात कार्य करत असताना सामाजिक सुधारणा जर घडवून आणायच्या असतील तर सामाजिक सुधारणेला राजकीय पाया देणे महत्त्वाचे आहे. याविषयी चर्चा सदरील ग्रंथात केलेली आहे. महाराष्ट्राचे चर्चाविश्व नीट समजून घ्यायचे झाल्यास सामाजिक, धार्मिक, बौद्धिक आणि राजकीय क्षेत्रांमधील असे पक्षोपपक्ष समजून घेतले पाहिजेत. रानडे-भांडारकर हे दोघेही सरकारी नोकर असल्यामुळे त्यांनी चालवलेल्या बहुतेक चळवळी सरकारी पाठिंब्याने, प्रसंगी आश्रयाने चालायच्या निदान त्यामुळे सरकार रुष्ट होणार नाही, अशी खबरदारी ते घेत असत.
सरकारशी सामंजस्याचे धोरण साधून समाजात राजकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेल्या कार्याच्या आढावा प्रस्तुत ग्रंथात घेतला आहे.आपण सर्व एकविसाव्या शतकाकडे चाललो आहोत. तरी तीनशे वर्षांपूर्वीच्या शिवाजी महाराजांचे स्मरण आजही अटळ आहे. पूजा-अर्चा करण्यापेक्षा चिकित्सा झाली पाहिजे. आज घरीदारी समाजात व एकूण देशात फार काय जगात अर्थप्रधानता आली आहे. चार पुरुषार्थांपैकी अर्थ या पुरुषार्थाला पहिले स्थान प्राप्त झाले. समाजामध्ये राजकीय क्षेत्र विषयी जाणीव जागृती निर्माण करणे. त्याविषयी आपल्या भाषणातून प्रबोधन करणे समाजाला विकासाच्या दृष्टिकोनातून नवनवीन योजनांची माहिती देणे. विविध कार्यासाठी राजकीय क्षेत्राने कायम जागृत राहून कार्य केले पाहिजे.
ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज व सत्यशोधकी समाज यांच्याद्वारे समाज व धर्मसुधारणा प्रथम प्रकट झाल्या. विद्याप्रसार, अस्पृश्यता निवारण वगैरे सर्व सुधारणांना पाठिंबा देणारे कायदे उपलब्ध झाले; पण कायद्याच्या योगे परिवर्तन होऊ शकत नाही. ते समाजानेच स्वतः केले पाहिजे. अनेक कायदे करून मोकळे होण्यात अर्थ नाही. अव्वल इंग्रजीत जे वरील नवसमाज व नवा धर्म, मते निघाली ती पुढे उत्तरोत्तर सर्वच लोकांनीच स्वतःच अव्हेरिली. वरील चळवळी स्वातंत्र्यातदेखील कोठे कोठे जीव धरून आहेत; पण काळानुरूप त्यांनी स्वातंत्र्यात नवे परिवर्तन केले पाहिजे. कारण स्वातंत्र्य आल्यावरचे प्रश्न नवे आहेत. शिवाजींचा आणि फुल्यांचा तोच काळ हल्ली नाही.
सत्यशोधक समाज, महात्मा फुले, रानडे, भांडारकर व एकूण दक्षिणेतील प्रबोधन उत्तरेत जाऊ शकले नाही. उत्तर हिंदुस्थानचा दक्षिणेवरच पगडा व प्रभाव पडत असतो. द्रविड चळवळीचे उत्तर हिंदुस्थानात प्रयोजन नाही. उत्तरेत ब्राह्मणी वर्चस्व फारसे नाही, नसावे. तरी जास्तीत जास्त सचिव व मंत्री ब्राह्मणांतील आहेत. म्हणून स्वातंत्र्य आल्यावरही ब्राह्मणी राज्य आहेच ! त्यांच्या गुणवत्तेवर इतरांनी मात केली नाही. ही नवी जिद्द हवी आहे.