Share

काही दिवसांपूर्वी कवी, लेखक व महाराष्ट्र राज्यशासन पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक विजयकुमार देसले यांचे ‘पाऊलखुणा’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रंगतदार प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच आत काय असेल याची मला उत्कंठा लागली होती.सर्व पुस्तक कसे वाचून झाले हे समजलेच नाही.
या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व निवेदक अरुण म्हात्रे सर यांची प्रस्तावना लाभली आहे.तसेच महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या शुभेच्छा या पुस्तकासाठी मिळालेल्या आहेत.हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मनिवेदनचं आहे.अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक समाजात आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे.चित्रकार संजय फर्डे यांनी कलात्मकतेने रेखाटलेले मुखपृष्ठ सर्वांचे अवधान केंद्रित करण्यात कुठेही कमी पडत नाही. मेघा प्रिंटर्स ठाणे यांचेकडून मुद्रीत झालेले हे पुस्तक प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारे आहे.
‘पाऊलखुणा’च्या रुपाने लेखकाचा आतापर्यंतचा प्रवास तर कळतोचं ; पण ज्या शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे ते लहानाचे मोठे झाले तिथल्या आजूबाजूच्या गावांचा, शाळांचा, तेथील शिक्षकांचा व एकूणच तिथल्या सामाजिक स्थितीचेही यथार्थ चित्रण आपणास अनुभवास मिळते.
नवीन वर्षाचा संकल्प, आदर्श गुरुजन वर्ग, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, देवतुल्य बाबा, मैत्रीतील ऋणानुबंध, आठवणीतील व्यक्तिमत्वे यांसारख्या अनेक लेखांतून लेखकाच्या संवेदनशील मनाची साक्ष पटते. जीवनातील प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची लेखकाची दृष्टी प्रशंसनीय आहे.लेखकाची लेखनशैली अत्यंत सहज,सोपी पण तितकीच वास्तववादी आहे. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होण्याची लेखकाची अंतस्थ उर्मी वाखाणण्याजोगी आहे.
हे पुस्तक वाचल्याने लेखकाचे समाजाप्रती अनुभवविश्व किती व्यापक आहे याची आपल्याला कल्पना येईल. विद्यार्थी,पालक व समाजातील प्रत्येक व्यक्ती ह्या पुस्तकाच्या वाचनाने भावनिकदृष्ट्या स्वतःचे नक्कीच आत्मपरीक्षण करेन. समाजात वैचारिक जाणीव निर्माण व्हावी ह्या उद्दिष्टपूर्तीसाठी या पुस्तकातील अनेक लेख महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात.
पालकांनो समंजस व्हा,पालकांच्या वाढत्या अपेक्षा, वाचन समृद्धीने नटलेले गाव, संस्कारक्षम शिबीर, आनंददायी शिक्षण,पुस्तकाचे गाव भिलार, आंतरराष्ट्रीय योगदिन, महाराष्ट्रातील आदर्श गावे, मुलांचा आनंदोस्तव, कोरोनाने काय शिकवले यांसारख्या नानाविध सामाजिक विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असल्याने त्याला सामाजिक अधिष्ठान आहे.
या पुस्तकाचे लेखक उपक्रमशील शिक्षक असून उत्तम कवी आहेत.समाज जागृतीसाठी लेखकाचे व्याख्यानाचे अनेक कार्यक्रम सुरु असतात.त्याचा प्रत्यंतरही पुस्तक वाचताना पावलोपावली आपल्याला येईल.समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने ते सतत समाजामध्ये विविध उपक्रम करत असतात.
अपघात, मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका, संस्कार अशा अनेक सामाजिक विषयांना या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने स्पर्श केला आहे. तरुणांसमोरील आव्हाने, पालकांसमोरील समस्या, संस्कारांची रुजवणूक, सर्वधर्मसमभाव,वाचनाचे महत्त्व यांसारखे अनेक विषय सर्वांसमोर ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
समाजात वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठीचा हा लेखन प्रपंच असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने हे पुस्तक डोळ्याखालून घालावे व संग्रही ठेवावे असेच आहे. ‘पाऊलखुणा’ हे पुस्तक मोठ्यांबरोबर लहानग्यांनीही वाचावे असे मला मनोमन वाटते.ह्या पुस्तकाच्या रूपाने समाजात वैचारिक बदल होईल अशी मला खात्री आहे.

(पाऊलखुणा- वैचारिक लेखसंग्रह/लेखक : विजयकुमार देसले/प्रकाशन : रंगतदार प्रकाशन/स्वागतमूल्य:१५०)

पुस्तक परीक्षण – डॉ. हेमंत चित्ते (MVP Samaj’s Adv Vitthalrao Ganpatrao Hande College of Education Nashik)

Related Posts

The Undying Light

Sanjay Aher
ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे...
Read More