पुस्तकाचे नाव : कोसला
लेखक : भालचंद्र नेमाडे
Book Reviewd by : शिंदे अश्विनी विजय
Class : S.Y.B.C.S.
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
बऱ्याच दिवसांपासून मी कोसला वाचण्याच्या विचारात होते. माझ्या जन्माच्या 41 वर्ष आधी आलेली, ही कादंबरी मला समजेल का हाही प्रश्न मला होताच. कारण, बरेच वाचणारे लोक म्हणायचे की ही कादंबरी समजायला कठीण आहे, भाषा विचित्र आहे, तसेच कादंबरी अतिशय अप्रतिम आणि वाचनीय आहे. ही कादंबरी माझ्या परिसरात कुठेही उपलब्ध नव्हती, अशा वेळी आपलाच मराठी पुस्तक प्रेमी समूहातील डॉ.अतुल वचारकर या सदगृहस्थांनी ही कादंबरी मला पाठवली आणि मला भरपूर आनंद झाला. मी त्यांची खूप आभारी आहे. मग मी ही कादंबरी वाचेपर्यंत अगदी तसं वातावरण निर्माण व्हावं म्हणून गाणे ऐकणे, चित्रपट पाहणे, मोबाईलचा अतिवापर या सवयी काही दिवस पूर्णपणे टाळून, “मिशन कोसला” ठरवलं आणि कामाला लागले. एका नव्या कथाविश्वात सर्वस्वी रमण्यासाठी.
कोसला 1963 मध्ये आलेली ज्ञानपीठ प्राप्त आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. मी काही दिवसांपूर्वी कोसला वाचली नंतर कित्येक दिवस मी फक्त विचार करत राहिले. पांडुरंग सांगवीकर आणि माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला फार सारखाच वाटला. कोसलाची तिरकस आणि लहान वाक्याची भाषा हेच कोसलाचे वैशिष्ट्य आहे .
माझ्या मते कसला ही कादंबरी नाही तर अख्खविश्व आहे. पांडुरंग सांगवीकरांच्या डोळ्यांनी पाहिलेलं जग आहे. ही कादंबरी निराशावादाचेही काही प्रमाणात समर्थन करणारी आहे. तरीही, ते वाचताना आपल्याला क्षणभरही कंटाळा येत नाही. पांडुरंग सांगवीकर हा सांगवीसारख्या खेड्यात राहणारा तरुण पुण्यात शिक्षणासाठी वस्तीगृहात राहतो आणि तिथे त्याला अनेक बरे वाईट अनुभव येतात. नंतर परत तो गावाकडे येतो आणि तिथेहि त्याला अनेक अनुभव येतात. ज्यातून तो कायम शिकत राहतो. त्या काळात अनेक जणांनी कोसला वाचून आत्महत्या केली आहे असं म्हटलं जातं. निराशावाद आणि आत्मशोधाचा खोल आणि गंभीर चिंतन हे कदाचित या मागचं कारण असू शकतं.
कोसलातील मनीच्या मृत्यूचे प्रकरण खूप प्रसिद्ध आहे. अभिनेते किशोर कदम यांनी त्या प्रकाराचे अभिवाचनही केलं. अत्यंत हृदय द्रावक प्रसंगाचे त्यांनी त्यात वर्णन केला आहे. जे लोक साहित्यातील तेच तेच पणाला कंटाळलेले होते कोसलाने पुन्हा त्यांना वाचनाकडे वळवले. खांडेकर, खानोलकर, गडकरी यांच्या पेक्षा वेगळा शैलीचा आशय आणि तंत्राच्या बाबतीत वैविध्य आणि नवेपना असणार, वाचकांची अभिरुची संपन्न करणारं साहित्य कोसलाच्या माध्यमातून वाचकांना मिळालं.
नेमाडेंच्या कविताही वाचल्यात मी देखणी आणि मेलडी काव्यसंग्रहातल्या! नेमाडे यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब त्यात उमटल्याचा आपल्याला जाणवतो. एका कवितेत, “हे लांब लांब रस्ते जुने होत नाहीत किंवा संपतही नाहीत असे ते म्हणतात”. यातून त्यांच्या समृद्ध भावविश्वासाच आपल्याला दर्शन घडतं. त्याचवेळी दुसऱ्या कवितेत ते “दिवस दिवस नसतात, रात्री रात्री नसतात, असं म्हणतात सगळे आवाज बिनखुनांचे” अस ते लिहितात. गुढ अगम्य कवितेतही त्यांचे योगदान हे त्यानिमित्ताने जाणवतं. त्यांच्या कविता या बऱ्याच दीर्घ कविता आहेत.
बऱ्याच जणांना कोसला आवडत नाही किंवा ते पूर्ण कोसला वाचू शकत नाही असं ते म्हणतात परंतु कोसला समजण्याची तयारी असेल तर कोसला समजू शकते. तितकीही अवघड नाही. दोन-तीन वेळेस लक्ष देऊन वाचली तर काहीच न कळणाऱ्यांना सुद्धा लगेच ही कादंबरी कळते. या कादंबरीत उगाच लांबलाच, पोकळ वर्णने नाहीत. कथा एका समांतर दिशेने योग्य गतीने पुढे वाटचाल करते.
आपल्याला ही कादंबरी वाचून झाल्यानंतरही त्यातल्या बाबींवर विचार करायला मजबूर करते. नकळतच आपण त्या गोष्टींवर स्वतःची मते तयार करू लागतो! एक वेगळ्या भावनिक प्रवासावर जाण्यासाठी, मनसोक्त भटकंती करण्यासाठी कोसला वाचायलाच हवी.