Vatpade Mayur Vithoba
(S.Y. B. Pharm.)
GES’s Sir Dr M S Gosavi College of Pharmaceutical Education and Research,
Nashik-5- Library
सदर सारांश हा शिवाजी सावंत लिखित छावा या मराठी कादंबरीचा आहे. सदर कादंबरी वाचल्यावर संभाजी महाराजांची ओळख लेखकांनी अनेक रूपातून करून दिलेली आहे.
शिवपुत्र संभाजी महाराजांचा जीवन प्रवास म्हणजे एक अग्निदिव्य. छत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब पाच लाखांच सैन्य व 14 कोटींचा खजिना घेऊन दख्खन जिंकायला निघाला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला नऊ वर्ष निकराचा लढा देऊन जेरीस आणलं. दख्खन जिंकायला निघालेल्या त्या क्रूर औरंगजेबाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर विराजमान होता आलं नाही. एक शूर लढवय्या,कोणत्याही प्रसंगी माघार न घेता लढणारा वीर,धोरणी राजकारणी,प्रजाहितदक्ष राजा,तरल संवेदना जाणून त्या शब्दबद्ध करणारा कवी,कर्तव्यनिष्ठ पुत्र,प्रेमळ भाऊ नि आदर्श पती. पण या सर्वातही त्यांची खरी ओळख लेखकांनी करून दिली आहे ती माणूस म्हणून. मराठा साम्राज्याचे राजे असूनही त्यांनी गरीब जनतेवर कधी अन्याय होऊ दिला नाही. प्रसंग पडताच आप्तजणांना विरोध करून त्यांना शिक्षाही केल्या, पण निरापराध्यांचा बळी पडू दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव असायचा त्यांच्या मनी. औरंगजेबाच्या कुटील कारस्थानी महासत्तेसमोर त्यांचं हे माणूसपण निश्चितच निर्विवादपणे मोठं वाटलं.
संभाजी राजे जेव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेव्हा खरं तर चुकी जास्त परिस्थितीची होती. सोयराबाई आणि दरबारातील काही महत्त्वाचे मंत्री गण यांनी संभाजी राजांविरुद्ध अशी स्थिती निर्माण केली. सततच्या अशा कटकारस्थानांमुळे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना या सर्वांपासून दूर ठेवलं. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर देखील त्यांना संभाजी महाराजांना सोबत नेता आले नाही. यातून कळत नकळत संभाजी महाराजांचं मन दुखावलं आणि त्यांनी बंड पुकारले. पण हे बंड स्वराज्य विरुद्ध कधीच नव्हतं. पण या गोष्टीमुळे संभाजी महाराजांबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाले. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी गमावलेलं सर्व काही मिळवलंही कारण स्वतःच्या ताकतीवर विश्वास असणाऱ्या त्या छाव्याला औरंगजेबाची भीती कधी वाटलीच नाही.
संभाजी राजांना माहीत होतं त्यांच्या वाहून गेलेल्या रक्ताच्या एकेक थेंबातून पुन्हा असे लाखो संभाजी जन्माला येतील. जे या मातृभूमीचे सगळ्या वाईट प्रवृत्तींपासून रक्षण करतील. ते गेले पण जगाला एक कायमची शिकवण देऊन गेले. कितीही खडतर परिस्थिती आली तरी हार मानायची नाही. स्वतःच्या जन्मदात्याला मरणयातना देणारा, सख्ख्या भावाला जीवे मारणारा, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा औरंगजेब आणि स्वतःच्या पित्याचा एक शब्दही खाली पडू न देणारे, सावत्र आईने त्याच्या मृत्यूचा कट रचला, तरी देखील तिला माफ केलं, सावत्र भावाचा जराही राग न करता त्यांच्यावर निर्भर प्रेम करणारे शंभूराजे यांची तुलना होऊच शकत नाही.
पुस्तकाचा शेवट वाचताना तर अक्षरशः रडू कोसळते. सिंहासमान आयुष्यभर लढणारा तो वीर फसवला गेला तो स्वकियांकडूनच. ज्याला शत्रूचा भय कधीच वाटलं नाही, त्याला आपल्याच माणसांनी फुटकळ विलोभनांपायी फसवलं. त्या महान राजाची विटंबना औरंगजेबाने केली, याची कल्पना सुद्धा करवत नाही. तितकं सगळं होऊनही तो छावा औरंगजेबापुढे नमला नाही.
आपल्या ध्येयासाठी अंतिम श्वासापर्यंत लढणाऱ्या व्यक्तीच बलिदान कधीच व्यर्थ जात नसतं. त्या बलिदानातूनच पुढच्या पिढीला जगण्याची नवीन आशा मिळते. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या छाव्याला विनम्र अभिवादन, त्यांची शिकवण सदैव मनात राहील, हीच अपेक्षा.
-Vatpade Mayur Vithoba