(पुस्तक परीक्षण- अनिल मोहन दळवी, Librarian) JSPM Narhe Technical Campus, Pune
प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे “प्रकाशवाटा”. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या दुर्गम भागात ‘माडिया-गोंड’ ही कशीबशी लाज झाकावी एवढीच कपडे वापरणारी अतिशय मागासलेली जमात वास्तव्य करून आहे. अंगभर कपडे घातलेला माणूस बघून घाबरून दूरवर जंगलात पळून जाणारे हे आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेले या कथेतून अनुभवायला मिळतात.
डॉ. प्रकाश आमटे त्याचे बालपण आणि जडणघडणीच्या अनेक प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे खरंतर प्रकाश आमटेंच्या जीवनातील अनेक किस्स्यांचा संग्रहच. यातील काही खळखळून हसवतात, तर काही डोळ्यातून टचकन पाणी आणतात. हे सर्व किस्से एकेमकांमध्ये सुसंबद्धपणे गुंफून आमटेंनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाची आणि त्यांच्या जीवनाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या या प्रवासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचावे. अगदीच काही नाही तर अनेक गोष्टींविषयी एक नवा दृष्टिकोन नक्की मिळेल.
ध्येयवेड्या वृत्तीच्या डॉ. बाबा आमटेंनी अशा या दुर्गम भागात प्रकल्प उभारण्याचे ठरवले. वयाच्या साठाव्या वर्षीची बाबांची जिगर पाहून डॉ. प्रकाश यांनी तत्काळ या प्रकल्पाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्यात त्यांची नुकतेच लग्न करून आलेली पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. “प्रकाशवाटा” मध्ये मनाला चटका लाऊन जाणारे अनेक प्रसंग आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून मार्ग काढत हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणाऱ्या झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे.