“मी म.स.गा. महाविद्यालयाच्या सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या ग्रंथालयात गेल्यावर अगदी डाव्या बाजूस असलेल्या विभागात जरा डोकावून येतो. काल्पनिक कथा वाचण्यापेक्षा वास्तविक जीवनात आलेल्या अनुभवावरून जडणघडण झाली होती असे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर विभूतींची चरित्रे, जी आपल्याला नेहमीच प्रेरणादायी वाटतात, मला आवडतात. असंच एक पुस्तक माझ्या बघण्यात आले. सुरूवातीला मधु, मधुकर रामचंद्र, लिमये यांनी लिहिलेले सौहार्द वाचले. नंतर मधुंच्या पत्नी चंपा लिमये लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन, पुणे प्रकाशित पुस्तक वाचलं.
चंपा लिमये यांनी लिहिलेले पुस्तक (चरित्र ग्रंथ) मला वाचायला आवडायचं कारण म्हणजे त्यात सौ. लिमयेंच्या माहेरचा म्हणजेच अमळनेरचा असलेला उल्लेख. मीही तीन वर्षे अमळनेरला शिक्षणासाठी राहिलो होतो, आणि त्यामुळे साहजिकच अजूनही अमळनेरचे अप्रुप वाटते.
स्मृतिसुगंध या पुस्तकात सौ. लिमयेंनी मधुंच्या राजकीय जीवनाची तपशीलवार मांडणी केली आहे. त्यात मधुंचे दौरे, सभा, तेथील भाषणे, दिल्ली येथील वास्तव्यात त्याच्याकडे येणारी जाणारी विभिन्न क्षेत्रात वावरणाऱ्या मंडळींसोबत नातलगांच्या आठवणींचा उल्लेख केला आहे. पुस्तकाची सुरुवात लेखिकेने मधुंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांना जिवंत करणारी आणि मान्यवर विभूती सोबतच्या छायाचित्रांनी केली आहे. त्यामुळे साहजिकच चरित्रग्रंथाचा कालावधी स्पष्ट होतो. एकूण पंधरा प्रकरणात विस्तारलेल्या या ग्रंथाची सुरुवात लेखिकेच्या मनोगताने होते. मधुंच्या लोकसभा प्रवेशाच्या प्रवासात त्यांना कोणकोणत्या सहकाऱ्यांनी कशी मदत केली याचा ऊहापोह केलेला आढळतो. अर्थात मधु त्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते आणि त्याचा मुंगेरच्या जनतेला झालेला आनंद आणि वृत्तपत्रांनी कशी अग्रलेखातून प्रसिद्धी दिली इ. सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. आमचं दिल्लीचं विश्व मध्ये दिल्ली कशी अद्भुत नगरी आहे हे विविध दैनंदिन प्रसंगांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली येथील वास्तव्यात त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्ती, वर्तमान पत्र, जेवणं, विविध वकिलातीत जाणं येणं, संगीत मैफिली, राष्ट्रपती भवनातील आठवणींचा उल्लेख आढळतो.
मधुंच्या सरळसोट स्वभावाचा अनेक लोक गैरफायदा घेत असत. त्याचा उल्लेख आओ जाओ घर तुम्हारा मध्ये केला आहे. लेखिकेने मधुंच्या मुंगेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दौरे, दरम्यान इंदिरा सरकारकडून झालेल्या अटकेत मिळालेली वागणूक इत्यादी चित्रित केलेले प्रसंग अंगावर शहारे आणणारे आहेत. लेखिकेच्या माहेरच्या नात्यागोत्याचा सविस्तर परामर्श आपल्याला जाणवते की त्यांचे वडील अमळनेरचे विख्यात वकील, काका, काकू, आत्या, त्यांचे यजमान इ. सर्व उच्च शिक्षित. तरीही बरेच जण सामाजिक कार्याकरता संपूर्ण जीवन समर्पित कार्यकर्ता अशा प्रकारे जगणारे. असे एकंदरीत स्वप्नवत वाटणारी ही मंडळी खरंच आपल्या देशात होती का अशी शंका येते. आजच्या काळात तरी तसेच वाटते. ”