Review By Mr Vinod Dajiram Ranpise, Office Superintendent (Incharge), Mamasaheb Mohol College, Pune
‘कर्मवीर भाऊराव पाटील आणि सत्यशोधक चळवळ यांचे योगदान’ हे डॉ. नंदा राशीनकर यांचे पुस्तक वाचताना समजले. आपल्या कार्यकर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठलेली माणसं असल्यामुळेच आपला समाज प्रगती पथावर आहे. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील या पुस्तकातून आपणाला समजतात.
आज ही महाविद्यालयीन शिक्षणा संदर्भात कर्मवीर भाऊराव पाटील यांची दूरदृष्टी असल्याचा प्रत्यय येतो. त्यांनी सुरू केलेली “कमवा व शिका योजना’ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याच नावाने ‘कमवा व शिका’ योजना अखंडपणे सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातही कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका योजनेचा लाभ अनेक विद्यार्थी घेऊन आपले शिक्षण पूर्ण करतात. कमवा व शिका योजना विद्यार्थ्यांसाठी त्या काळापासून एक सुवर्णसंधी आहे ज्यामध्ये अनेक विद्यार्थी घडले आहेत. आपल्याला माहीत असलेले कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी, वस्तीगृहाचे निर्मिती करणारे, शाळेविना एकही खेडे असू नये या हेतूने झपाटलेले कर्मवीर भाऊराव पाटील आपणास माहीत आहेत.
या पुस्तकातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्यक्तित्त्वाचे अनेक पैलू उलगडले आहेत. साधी राहणी, सार्वजनिक कार्याची प्रचंड आवड, कष्ट करून माळरानावर नंदनवन फुलवण्याची जिद्द, सत्यनिष्ठता, अलौकिक धैर्य, चिकित्सकपणा, कामावर अढळनिष्ठा, एकनिष्ठ, समतावृत्ती, अन्याय अत्याचाराला विरोध, स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा अशा अनेकविध गुणांचे दर्शन म्हणजे कर्मवीर. २० व्या शतकात सत्यशोधक चळवळ, ब्राह्मनेत्तर चळवळ, दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटीलांनी सक्रिय सहभाग घेतला. आपलं कार्य जोमाने चालू ठेवले. त्यासोबत शिक्षण, अस्पृश्यता निवारण, शेती, शेती शिक्षण, सहकारी सामुदायिक शेती, संस्थात्मक बांधणी, आर्थिक क्षेत्रातील मागास समाज घटकांचे सबलीकरण, ज्ञानाचे क्षेत्रातील हक्क मिळवून देणे अशा समग्रलक्षी दृष्टिकोनातून चळवळीत कार्य केल्याचे दिसते
महात्मा फुले यांच्या नंतर सत्यशोधक चळवळीचा वारसा कोल्हापुर येथे शाहू महाराज व इतर सहकाऱ्यांनी चालू ठेवला होता. तोच वारसा शाहू महाराजांनंतर यशस्वीपणे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जोपासला. त्यांनी सत्यशोधक चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर प्रभाव असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसते. सत्यशोधक समाजाच्या जलशामध्ये सहभाग घेऊन लोकजागृतीचे काम केले. त्या काळात सत्यशोधक चळवळ ही ब्राह्मणांच्या विरोधी नव्हती, तर ती समाजात करण्यात येणाऱ्या भेदभावाच्या आणि अनिष्ट अशा अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा यांच्या विरोधात होती समाजात समता आणण्याचे कार्य सत्यशोधक चळवळ करीत होती आणि त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचे मोठे योगदान आहे. माणुसकी हा धर्म व मानवता ही जात, देवाच्या दारी भेदभाव नाही, अज्ञान अंधकार घालवण्यासाठी शिक्षण घ्या दृष्ट रूढी परंपरेला नकार, जातीभेद मानू नका, दारूचे व्यसन करू नका या विषयांवर तासन तास कर्मवीर भाऊराव पाटील भाषण देत. २०व्या शतकात सत्यशोधक चळवळीमध्ये काम करताना कर्मवीर भाऊराव पाटलांचा प्रत्यक्ष संबंध महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्य सेनानीशी आला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील हे कधीही राजकारणात उतरले नाहीत व शेवटपर्यंत सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून कार्यरत राहिले तरीही त्यावेळी असलेल्या राजकारणी लोकांशी त्यांचा संपर्क आला, अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले परंतु त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांनी राजकारण नाही तर समाजकारण करण्याची इच्छा व्यक्त केली व त्याप्रमाणे ते कार्यरत राहिले.
लेखकाच्या दृष्टिकोनातून कर्मवीर भाऊराव पाटील हे फक्त शिक्षण महर्षी किंवा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक एवढीच ओळख नसून त्यांनी सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या माध्यमातून काम करताना बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार केला, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आधुनिक मूल्याचा अर्थ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चळवळीमधून समजून घेतला व या मूल्यावर आधारित चळवळीला आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असे व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. २० व्या शतकातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि सत्यशोधक चळवळ यांचे योगदान जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे. मी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले असून ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असे ठामपणे मी सांगू शकतो. कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण महर्षी असेच मला माहित होते, ‘कर्मवीर भाऊराव पाटील आणि सत्यशोधक चळवळ यांचे योगदान’ हे नंदा राशीनकर यांचे हे पुस्तक मला भेट स्वरूपात मिळाले. मी वाचलेल्या पुस्तकावरून सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल माझ्या मनात अजून जास्त आदर वाढला आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांची दूरदृष्टी, कल्पकता, ध्येय आणि इतिहास समजून घेण्यासाठी हे पुस्तकa आवश्यक वाचावे.