Share

पुस्तक परीक्षण प्राध्यापक डॉ शेठ रुपाली एम .जी ई .एस श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय लक्ष्मी रोड पुणे
तुरुंगरंग हे ऍड. रवींद्रनाथ पाटील लिखित पुस्तक एक प्रभावी आणि वेगळा दृष्टिकोन मांडणारे आहे, ज्यात लेखकाने आपल्या तुरुंगातील अनुभवांचे बारकाईने विश्लेषण करून वाचकांसमोर सादर केले आहे. लेखक स्वतः एक भूतपूर्व आयपीएस अधिकारी असून, सायबर तज्ज्ञ आणि आता उच्च न्यायालयातील वकील म्हणून कार्यरत आहेत. येरवडा कारागृहातील साडेतेरा महिन्यांच्या अनुभवाच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक तीन भागांमध्ये विभागले आहे – आरंभ, मध्य, आणि अखेर.
तुरुंगाच्या चार भिंतींच्या आतले जग, त्यातील कैद्यांचे जीवन, त्यांचे समीकरणे, त्यांच्या भावना, तसेच तुरुंग व्यवस्थेतील असंख्य पैलू हे लेखकाने अतिशय समर्पक शब्दांत मांडले आहेत. गजाआडच्या जगातील क्रूरता, मानवी भावभावना, आणि विविध घटना व किस्से लेखकाने नेमकेपणाने टिपले आहेत.
पुस्तकात जेलच्या वावरण्यातून हळूहळू उलगडणारी माणुसकी, कैद्यांची वागणूक, त्यांच्या कथा, आणि त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार यांचा अभ्यास मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला आहे. लेखकाने जेल प्रशासन, कैदी, आणि विविध घटक यांच्याशी केलेल्या संवादांमुळे पुस्तकाला वास्तवाचा आधार मिळाला आहे.
सामान्यपणे तुरुंगाबद्दल अनेक गैरसमज आणि उत्सुकता असते. लेखकाने त्याला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ‘कसाबचे भूत’ या कथेसारख्या आख्यायिका किंवा तुरुंगातील गमतीशीर व विस्मयकारक प्रसंग वाचकांना एका नवीन दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करतात.
तुरुंगरंग” या पुस्तकाच्या आरंभ, मध्य, आणि अखेर या तीन भागांतून तुरुंगातील जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.
आरंभ
या भागातील जोडी जोडी यात्रा, मॅडम राऊंड, आणि दिनमान यांसारख्या प्रकरणांमधून तुरुंगातील रोजच्या जीवनाची सखोल माहिती मिळते. तुरुंगातील नियम, बंद्यांचे ठरलेले दिनक्रम, आणि त्यांचे अनुशासन कसे असते, याचा तपशील लेखकाने मांडला आहे. यामध्ये कैद्यांच्या दिनचर्येतील लयबद्धता आणि तुरुंगातील वातावरणाचे खरे स्वरूप उलगडते.
मध्य
भिशी, हंडी, भूत, व्यासंग, आणि धोंडा या प्रकरणांमधून वाचकांना तुरुंगातील हलक्याफुलक्या आणि मनोरंजक गोष्टींचा अनुभव येतो. भिशी आणि हंडी या प्रकरणांत कैद्यांच्या छोट्या सहकार्य गटांमधील जीवनशैली, सामायिक उपक्रम, आणि त्यातील सामाजिक समीकरणे समजतात. भूत ही आख्यायिका एकत्रित जीवनात घडणाऱ्या कथा-किस्स्यांमधील गंमत आणि अंधश्रद्धा यांचे चित्रण करते. धोंडा वाचताना कैद्यांच्या कल्पकतेचा आणि जगण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाचा अनुभव येतो.
अखेर
माणूस गुन्हेगार का होतो? त्याचे जीवन कुठे चुकते? त्याचे निर्णय कसे प्रभावीत होतात? यासारख्या प्रश्नांवर आधारित काहीतरी चुकतंय आणि मागे वळून पाहताना या प्रकरणांमधून लेखकाने वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास, त्यांच्या कृतीमागची कारणमीमांसा, आणि त्यांच्या जीवनातील दोष व चुका यांचा हा भाग मनाला स्पर्श करणारा आहे.
पुस्तकाचे सार
लेखकाने आपल्या अनुभवांतून केवळ तुरुंगातील जीवनाचे वर्णन केले नाही, तर माणूस गुन्हेगार कसा बनतो, त्याच्या विचारसरणीवर काय परिणाम होतो, आणि पुन्हा समाजाशी जोडण्यासाठी त्याचा संघर्ष कसा असतो, याचाही विचार मांडला आहे.
हे पुस्तक केवळ तुरुंगातील जीवनाचे वर्णन नसून, सामाजिक व्यवस्थेचे आणि माणसांच्या चुकांमागील मानसिकतेचेही अभ्यासपूर्ण चित्रण करते. त्यामुळे, तुरुंगाविषयी आणि समाजातील गुन्हेगारी प्रणालीबद्दल समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचनीय ठरते. लेखकाचे अनुभव आणि लेखनशैली दोन्हीही प्रभावी असून, वाचकांना विचारमग्न करणारे आहेत.
जग हे बंदिशाला,
कुणी न इथे भला चांगला,
जो तो पथ चुकलेला
हे पुस्तक वाचकांना एकाच वेळी विचारशील बनवते आणि मनोरंजनही करते. त्यामुळे “तुरुंगरंग” हे पुस्तक केवळ एक कहाणी नसून, जीवनाचे विविध रंग उलगडणारे दस्तऐवजीकरण ठरते.लेखकाच्या या धाडसी प्रयत्नाचे आणि त्यांच्या लेखनकौशल्याचे खरोखरच कौतुक करावे लागेल. “तुरुंगरंग” हे पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे!
डॉ रुपाली शेठ
९८८१६७७०१०

Related Posts

हृदयस्पर्शी

Nilima Deshpande
Shareधरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी...
Read More