चव्हाण सचिन रमेश (विद्यार्थी तृतीय वर्ष संगणक विभाग अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५) यशाची गुरुकिल्ली’ हे पुस्तक यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन करणारे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. लेखकाने आपल्या अनुभवांद्वारे आणि प्रेरणादायी उदाहरणांद्वारे यशाकडे जाण्याचा मार्ग सोप्या भाषेत मांडला आहे. पुस्तकाच्या शीर्षकातूनच यशाचा मूलमंत्र शोधण्याचा उद्देश स्पष्ट होतो.
पुस्तकात यश मिळवण्यासाठी विविध पैलूंवर भर देण्यात आला आहे. ध्येये निश्चित करणे आणि त्यावर सातत्याने काम करणे या यशस्वी जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी लेखकाने उलगडून दाखवल्या आहेत. आत्मविश्वास, धैर्य, शिस्त, आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक तत्त्वे लेखकाने प्रकरणांद्वारे सविस्तरपणे समजावली आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी या पुस्तकातून उपयुक्त मार्गदर्शन मिळते. आपण आपल्या शरीरावर कसे काम करू शकतो, त्याला योग्य वळण कसे लावू शकतो, तसेच आपली बुद्धी योग्य पद्धतीने कशी वापरावी, हे पुस्तकात सोप्या भाषेत सांगितले आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती देऊन त्या सोप्या उदाहरणांसह स्पष्ट केल्या आहेत, ज्यामुळे वाचकांना त्यांचा उपयोग सहज करता येतो.
लेखकाने यशस्वी होण्यासाठी आवश्यक तत्त्वे आणि मंत्र दिले असून, त्यातून वाचकाला प्रेरणा मिळते. कितीही खचलेला माणूस असला तरी हे पुस्तक वाचल्यानंतर तो स्वतःला सुधारण्यासाठी किंवा चांगले काम करण्यासाठी प्रेरित होतो. यामधून वाचकाला जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन मिळतो.
आयुष्यातील चढ-उतारांबाबत लेखकाने सुंदर विचार मांडले आहेत. चढ म्हणजे प्रगती, आणि उतार म्हणजे अडथळे. अपयश म्हणजे यशाकडे नेणारा टप्पा आहे. एकदा यश मिळायला सुरुवात झाली की, ते सतत मिळत राहते. लहान लहान ध्येये ठरवून ती पूर्ण करत पुढे जाणे, हा यश मिळवण्याचा मार्ग आहे. कठीण वाटणाऱ्या गोष्टी क्रमाक्रमाने केल्या, तर त्या सोप्या होतात, हे पुस्तकातून कळते.
लेखकाने स्पष्ट केले आहे की, “आपल्यापेक्षा दुसरा कुणीतरी जास्त श्रेष्ठ आहे” हा विचार मनातून काढून टाकायला हवा. कोणतेही काम निरपेक्षपणे केल्यास तेच यशस्वी होण्याच्या मार्गावर नेते. शारीरिक ताकद आणि मानसिक मजबुती या गोष्टी आयुष्यात यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
‘ यशाची गुरुकिल्ली’ हे पुस्तक वाचून प्रत्येक वाचकाला प्रेरणा मिळते आणि त्याच्या जीवनातील बदलांसाठी हा एक मजबूत मार्गदर्शक ठरतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचावे, असे मला वाटते.