मराठ्यांचा इतिहास हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक वेगळं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य सतराव्या शतकात स्थापन झाले. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे सक्षम नेतृत्व व कर्तुत्व आणि त्यांच्या सहकाऱ्यांची साथ महत्वपूर्ण ठरली. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महत्त्वपूर्ण सहकारी म्हणजे त्यांची अंगरक्षक सरदार बाबाजी ढमढेरे होय. मराठी सत्तेच्या स्थापनेपासून ते आस्थापर्यंत योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या घराण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील व शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील ढमढेरे घराण्याचा समावेश होतो. स्वराज्य स्थापनेतील, विस्तारातील व संरक्षणातील ढमढेरे सरदारांच्या कार्याची मांडणी या ग्रंथामध्ये केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज व पुढे पेशवे कालखंडात अनेक ढमढेरे सरदारांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले. मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान या पुस्तकात ढमढेरे सरदारांचे योगदान याचा सविस्तर आणि संशोधनात्मक अभ्यास केला आहे.
या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सर आणि इतिहासाचे अभ्यासक डॉ पदमाकार गोरे यांनी केले आहे. दोघेही या क्षेत्रातील एक व्यासंगी अभ्यासक आहेत. त्या दोघांच्या लेखणीतून हे पुस्तक साकारले आहे.
त्यांनी वेगवेगळया प्रकरणाच्या माध्यमातुन ढमढेरे सरदारांच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे.चोवीस प्रकरणाचा यात समावेश आहे. अफजल खानाची स्वारी व ढमढेरे सरदार, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम व सरदार बाबाजी ढमढेरे, शिवशंभू मिलनाचे साक्षीदार सरदार बाबाजी ढमढेरे, सरदार जानोजी ढमढेरे यांचा पाबळ विजय, पानिपतचे युद्ध आणि सरदार ढमढेरे, राक्षसभुवनाची लढाई आणि जयसिंगराव ढमढेरे अशा चोवीस प्रकरणाच्या माध्यमातुन हे योगदान मांडले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरांदर्याचीदौलत या पुस्तकातील जिद्द हे प्रकरण यात छापले आहे. यामुळे त्यांचा इतिहास अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.
या पुस्तकात सुरवातीला तळेगाव ढमढेरे या गावाविषयी माहिती दिली आहे. गावाचा ऐतिहासीक व भौगोलिक आढावा घेतला आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ठे म्हणजे यात अनेक ऐतिहासीक दस्तऐवज मूळ प्रती स्कॅन करून छापल्या आहेत. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अनेक विध्यार्थी अभ्यासक यांना याचा उपयोग होणार आहे.या दस्तऐवजाबरोबर त्या काळात ज्या प्रकारे पत्रव्यवहार केला जात होता पत्रव्यवहारात समाविष्ट असणारी अनेक मूळ पत्रे यात स्कॅन करून छापली आहेत. सामान्य वाचकाला अधिक इतिहास समजण्यासाठी याचा नक्किच उपयोग होणार आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ पदमाकर गोरे हे मोडी लिपीचे अभ्यासक असल्याने त्याकाळातील अनेक मोडी लिपीतील कागदपत्रांचा सोप्या भाषेत मराठी अनुवाद यात केला आहे.
या पुस्तकात कसबे तळेगाव ढमढेरे या गावाचा महसुलाचा ताळेबंद आहे. त्या काळातील जमा खर्च कसा होता याचा प्रत्यय त्यावरून येतो.
ऐतिहासीक लेखन करताना अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो त्याचे संदर्भ द्यावे लागतात याची माहिती यात दिली आहे. पुस्तकाची बांधणी खूपच आकर्षक आणि मजबूत केली आहे. अनेक ठिकाणी फोटो, चित्र यांचा वापर केला आहे. हे पुस्तक एक संदर्भ ग्रंथ आणि ढमढेरे सरदार यांचा एक ऐतिहासीक दस्तऐवज आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातुन मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान यावर प्रकाश टाकला आहे. हा इतिहास त्या गावासाठी प्रेरणादायी आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची प्रस्तावना आहे.