शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरी इसवी सन 1967 साली प्रकाशित करण्यात आली होती. मृत्युंजय शब्दाचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंत राहणे. महाभारताच्या युद्धात अनेक महारथी धारातीर्थी पडले, परंतु मृत्यूनंतरही जो मृत्युंजय ठरला तो होता महादानशूर कर्ण. कर्णाच्या व्यक्तिरेखेवर आधारित या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे 12 वा मूर्तिदेवी पुरस्कार 6 फेब्रुवारी 1996 ला देण्यात आला. याशिवाय देखील महाराष्ट्र शासन व इतर संस्थांद्वारे मृत्युंजय ला अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.
शिवाजी सावंतांची भाषा खरोखर अदभुत आणी रसाळ आहे. पुस्तक एकदा वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर खाली ठेवु वाटत नाही. वर्णन इतकं छान आहे कि आपण कर्णाबरोबरच ते सारं जणु अनुभवत आहोत अस वाटतं
पुस्तकाचे मुखपृष्ठ हे खूप रेखीव असून त्यात दानवीर ते धैर्यवीर कर्ण हे दीनानाथ दयाल यांनी उत्तम साकारले आहे. याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीरयष्ठी यावरून तो अचूक साधला गेला आहे हे समजून येते. मलपृष्ठावर स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या मूर्तीदेवी पुरस्काराचा फोटो आहे.
मृत्युंजय हे पुस्तकाचे नाव कर्णाच्या असीम जीवन संघर्षाचे प्रतिबिंब आहे हे जाणवते. मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा ज्याने जीवनाचा धुंद विजय अनुभवला म्हणूनच त्याचे नाव मृत्युंजय! मृत्यूवरही विजय मिळविणारा… वरून बघितले असता पुस्तक खूप जाड आणि मोठे वाटतही असेल परंतु एकदा वाचायला सुरुवात केल्यावर त्याची तंद्री लागते आणि पुस्तकाचे जाड असण्याचे भूत आपल्या मनातून उतरते. हे पुस्तक सावंतांनी मायभूमीच्या सौरक्षणात धारातीर्थी पावलेल्या शूरवीरांना अर्पण केलेलं आहे.
खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवन गाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणी भारलेलं हाेत कर्णाचं जीवन. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडलांविना शापीत कर्ण म्हणून थाेरांनी त्याला डिवचले पण अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत, मरणालाही हसत हसत कवटाळनारा हा मृत्युंजय म्हणुनच प्रेरणादायी ठरताे.
पुस्तकाची प्रस्तावना आणि त्याचा मथळा मोठा लाघवी आहे. हे पुस्तक कर्ण या व्यक्तिरेखेच्या भोवती फिरत असले तरी त्याला अनेक पैलू देखील आहेत. मुळात हे पुस्तक म्हणजे महाभारतातील महत्वाच्या व्यक्तिरेखांच्या स्वगताचा सारीपाठ आहे. कर्ण, कुंती, दुर्योधन, वृषाली, शौन आणि श्रीकृष्ण या साऱ्या व्यक्तिरेखांची स्वगत म्हणजे हे पुस्तक! जशा व्यक्तिरेखा बदलतात तसे वाचणारे आपण हे आपण स्वतः न राहता ती व्यक्ती होऊन महाभारतात प्रवेश करतो. आपण स्वतःला विसरून कधीतरी कर्ण कधी दुर्योधन तर कधी श्रीकृष्ण सुद्धा होतो. वाचकाला इतकी अत्युच्च अनुभूती देण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांना साधता आलेले आहे. लेखक शिवाजी सावंत यांचे यात सर्वात मोठे यश आहे. वाचकाला पूर्णत्व देण्याकडे त्यांचा प्रयत्न दिसतो. एकेक स्वगत हे अत्यंत महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे त्यांच्या ठाशीव शैलीत लिहिले गेलेले आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढून देण्याकडे त्यांचा कल दिसतो. वाचकांच्या मनातील सुतपुत्र, त्याचा जन्म, त्याची कवच कुंडले याची उत्कंठा त्यांनी शेवटपर्यंत ताणली आहेत. लेखकाने सर्व ठिकाणांचा, पात्रांचा आणि शरीररचनेचा पोशाखांचा म्हणजेच अगदी निर्जीव वस्तूंचा परिचय डोळ्यासमोर उभा रहावा असा केलेला आहे. त्यापैकी कवच कुंडलांचे वर्णन हे तर अगदी विलोभनीय आहे. श्रीकृष्णाच्या स्वगताचा भाग तर जास्तच मोहक झाला आहे. पुस्तकाची भाषा ही काहीशी जड वाटू शकते पण ती भाषा कठीण जरी असली तरी ती तुम्हाला प्रेमात नक्की पाडेल. पुस्तकाची भाषा आणि वाक्ये अशी काही आहेत की ते वाचल्यानंतर तीच वाक्ये तुम्ही दैनंदिन जीवनात देखील खूप वापरू लागता. मनोरंजनासाठी सांगायचे झाले तर शर्ट न मागता कापडाऐवजी ‘माझी कवच कुंडले द्या रे!’ अशी हाक पुस्तक वाचून येऊ शकते. शब्दरचना ही सखोल आहे आणि वाक्यरचना तर अगदी सुंदरतेच्या शिखरावर आहे. त्यामुळेच पुस्तकाला इतकी जास्त लोकप्रियता मिळालेली आहे. अनेकांच्या आयुष्यात असे अनुभव आलेत की, ते कितीही एकलकोंडे आणि स्वतंत्र असले तरी देखील ते या पुस्तकातील एखाद्या तरी पात्राशी स्वतःला जोडू बघतात. हे जर बदल घडले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच होतील आणि आयुष्याला एक वेगळा दृष्टिकोन नक्की लाभेल. आपली शब्द संपदा ही समृद्ध व्हावी आणि आपल्याला महाभारतातील अनेक गोष्टींचा उलगडा व्हावा यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे!